Pimpri: राज्यात नवीन 6 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण; बाधितांची संख्या पोहचली 107 वर
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही संख्या 107 वर गेली आहे. त्यामध्ये राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत कोरोनामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आधी जमावबंदी व नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. तरी, देखील नागरिक घराबाहेर पडताना दिसून येतात. त्यामुळे सरकारकडून वारंवार नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
राज्यातील जिल्हा आणि महापालिका हद्दनिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई – 41, मृत्यू 3
पुणे – 18
पिंपरी-चिंचवड – 12
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली-प्रत्येकी 5
नागपूर, यवतमाळ, सांगली – प्रत्येकी 4
अहमदनगर,ठाणे -प्रत्येकी 3
सातारा – 2
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, वसई विरार, रत्नागिरी, पुणे ग्रामीण प्रत्येकी -1
करोनाचे एकूण रुग्ण- 107
एकूण मृत्यू – 3
राज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. या पैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर १०७ जण पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत आहे. सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत.