Pimpri Crime News : बिर्याणी खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना कोयत्याने मारहाण; हॉटेल मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचा आणि हॉटेल मालकाचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून हॉटेल मालक आणि त्याच्या चार साथीदारांनी दोन ग्राहकांना कोयत्याने, हाताने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी वैशालीनगर, पिंपरी येथील गरीबनवाज हॉटेलमध्ये घडली.

आशिष बाळू राऊत (वय 21, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गरीबनवाज हॉटेलचा मालक आणि इतर तीन ते चार इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे मित्र निलेश आणि तुषार असे तिघेजण पिंपरी मधील हॉटेल गरीबनवाज येथे सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा हॉटेल मालकासोबत किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्यावेळी अन्य आरोपी तिथे आले तू मालकासोबत का भांडण करतो, असे म्हणून फिर्यादी आणि त्यांचा मित्र निलेश यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

जवळच पडलेला ट्रे फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांच्या डोक्यात मारला. तसेच एका आरोपीने कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.