Pimpri : जागेच्या वादातून टपरी पेटवली; दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून किराणा दुकानाची टपरी पेटवून दिली. यामध्ये दुकानातील साहित्यासह दुकानात बांधलेल्या दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 11) अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ घडली.

रफीक चांदसाहेब शेख (वय 27, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, झोपडपट्टी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जावेद मुसा कुरेशी (वय 36, रा.  अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, झोपडपट्टी, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफीक यांचे खुशबू किराणा स्टोअर नावाची किराणा मालाची टपरी आहे. आरोपी जावेद याने त्या जागेवर हक्क सांगून दुकान तेथून हटवण्यास सांगितले होते. मात्र रफीक यांनी दुकान हटवले नाही, याचा राग मनात धरून जावेद याने टपरी पेटवून दिली. दुकानात रफिक यांनी एक शेळी आणि एक बोकड बांधले होते. दुकानाला लागलेल्या दोन शेळ्यांच्या होरपळून मृत्यू झाला. तसेच दुकानातील फ्रीज आणि किराणा माल असे एकूण 54 हजारांचे साहित्य जळून खाक झाले आहे. यावरून रफिक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.