Pimpri : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी काहीजणांनी महिलेवर दबाव आणला. तसेच तिला मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. या रागातून तिघांनी पुन्हा महिलेला मारहाण केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास भारतनगर पिंपरी येथे घडली.

सचिन संजू गायकवाड (वय 30), श्रीकांत शिवाजी गोडबोले (वय 25), अरमान शेख (वय 24, सर्व रा. भारतनगर पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेवर दबाव आणला. ‘केस मागे घे नाहीतर तुझे जगणे मुश्किल करून टाकू’ अशी धमकी देत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत महिलेने बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी महिलेला पुन्हा एकदा शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पुन्हा पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.