Pimpri : शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करा; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरण 42 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे.

शहरवासियांना पाणीपुरवठा केल्या जाणा-या पवना धरणात सद्यस्थितीला 42 टक्के पाणीसाठा आहे. धरणात 4.6 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 4 जुलै पासून विद्युत निर्मिती यंत्रणा दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

वीज निर्मितीसाठी देण्यात येणारे पाणी शिल्लक राहत असून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेली पाणीकपात रद्द करण्यात यावी आणि शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.