Pimpri: उपमुख्यमंत्री पुत्र पार्थचा महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाय काय ?

Does Deputy Chief Minister's son Partha not trust Maharashtra Police? :अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सव्वा महिन्यानंतर उडी घेतली आहे. पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री पुत्र पार्थचा महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाय काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

केवळ चर्चेत राहण्यासाठीचा केवीलवाणा प्रयत्न नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने अचानक हे टोकाच पाऊल उचलल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

बॉलिवूड अजूनही या धक्क्यातून सावरलेल नाही. त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणी अनेक निर्माते, दिग्दर्शकांची चौकशी महाराष्ट्र पोलिसांकडून केली जात आहे.

अचानक तब्बल सव्वा महिन्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना जाग आली. त्यांनी सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) कडे देण्याची मागणी केली आहे.

सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी, गृहमंत्री स्वपक्षाचाच असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ यांचा महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाय काय, राज्य पोलिसांच्या तपासावर साशंकता असल्यानेच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्याचबरोबर पार्थ पवार सव्वा महिना उशिरा जागे झाले आहेत. त्यांची सीबीआय तपासाची मागणी म्हणजे चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पार्थ पवार गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हणतात…

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या युवकांसाठी सुशांत एक आयडॉल होता.

अनेक चाहत्यांनी याबाबत मला ईमेल्स, फोन, मेसेज केले. यात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेशमधील युवकांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले.

सुशांतला न्याय मिळवून द्यावा या युवकांच्या भावना योग्य आहेत. तसेच देशातील अनेक युवकांचा आवाज म्हणून मी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण, सुशांतला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची शिफारस करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.