Pimpri : बॅन्ड पथकातील कलावंतांना अर्थसहाय्य द्या – सागर गायकवाड
एमपीसी न्यूज – कोरोना या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना सिझनेबल काम करणाऱ्या कलावंतापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या सीझनच्या काळात आर्थिक नुकसान झालेल्या वाजंत्री कलावंत व त्यांच्या मालकांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र बॅन्ड कलाकार ऊत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी केली आहे.
ऐन सिझन मध्येच कोरोना संकट आल्यामुळे बॅन्ड मालक, कलावंत तसेच बेंजो पार्टी पथक, शहनाई वादक, तमाशा कलावंत या सर्वच कलावंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्यामुळे उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या विषाणूचे संकट पाहता संचारबंदी वाढवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संपूर्ण सीझन वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालून बँड पथक मालक व वाजंत्री कलावंत यांना आर्थिक मदतीची घोषणा करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.