Pimpri : अजित पवार यांच्या एकाधिकारशाही मुळेच पवना बंद पाईप योजना रखडली –योगेश बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना बंद पाईप योजना ही तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या एकाधिकारशाहीमुळेच रखडली, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी भाजप आमदार बाळा भेगडे आणि खासदार श्रीरंग बारणे हे जनतेची दिशाभूल करीत असल्याची टिका केली होती. त्यास बाबर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३३१ कोटी ११ लाख रूपयांची निविदा काढली सदर निविदा २०% जादा दराने सबंधित ठेकेदाराला देण्यात आली. ३० एप्रिल २००८ रोजी कामाचा आदेशही देण्यात आला जवळपास ३३१ कोटी रूपयाचे काम २०% जादा दराने ३९८ कोटी रुपयांना देण्यात आले.

स्थानिक शेतकऱ्यांची सहमती न घेता एकाधिकारशाहीने पोलिस बळाच्या द्वारे बंद पाईप टाकण्याचे काम चालू करण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांने प्रचंड विरोध करीत ९ ऑगस्ट २०११ रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर येथे रस्ता रोको करून अंदोलन केले. त्यात केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आणि जवळपास अकरा शेतकरी जखमी झाले होते.

  • या घटनेतील शहिदांना यादिवशी मावळ येथे सभा आयोजित करून श्रद्धांजली वाहिली जाते. सभे दरम्यान स्थानिक आमदार बाळा भेगडे यांनी पवना बंद पाईप योजना होऊ देणार नसल्याचे म्हटले. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या भाषणात ही योजना अजित पवार यांनी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दडपशाहीने काम चालू केले. यातूनच झालेल्या अंदोलनात गरीब तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे म्हटले होते. त्यावर काटे यांनी टीका केली होती.

बाबर यांनी पत्रकात म्हटले आहे की, पवना बंद पाईप योजना बंद पडणे हे तत्कालीन पालकमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधीश अजित पवार यांच्या एकाधिकारशाहीनेच रखडली आहे. हे अजित पवार यांच्या बगलबच्च्यांनी समजून घ्यावे. स्वार्थासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे या योजनेसाठी १४२ कोटी आत्तापर्यंत पाण्यात घातले आहे.

  • स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बंद पाईप योजनेला लागणाऱ्या जमिनीचे संपादन न करता पोलीस बळाद्वारे ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न हा चुकीच्या मार्गाने केल्यानेच ही योजना केवळ अजित पवार यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे रखडली आहे हे पवारांच्या बगलबच्च्यांनी समजून घ्यावे. या योजनेत मार्ग काढण्याचा प्रयत्न खासदार श्रीरंग बारणे करीत असून राज्य सरकारच्या जलसंपदा मंत्र्यांबरोबर अनेक बैठक घेऊन गहुंजे आणि शिवणे येथे दोन बंधारे मंजूर असलेल्या बांधाऱ्यांची कार्यवाही चालू आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी भाजपा आणि शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत असून आगमी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बंद पाईप योजनेच्या माध्यमातून टीका करीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरातील विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बगलबच्चे आपले डिपॉझिट वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे बाबर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.