Pimpri : तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही रेशन दुकानदारांना महिना पगार द्या – संतोष वाळके
एमपीसी न्यूज – कोरोनासारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग दुकानदारांच्या विविध समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे व तमिळनाडूच्या धरतीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांना महिना वेतन सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. केली आहे.
याबात मंत्री भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनासारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग दुकानदार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देत आहेत. या साथीच्या आजाराचा धोका असताना दुकानदार शासकीय सुरक्षा व आर्थिक मदत नसताना निरंतर मेहनत घेत आहेत. अन्न सुरक्षा कायद्याखाली धान्याचे वितरण करणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी रेशन दुकानदार कोणत्याही सुरक्षा शिवाय मेहनत घेत आहेत.
रेशनिंग दुकानदारांना किलो मागे दीड रुपया कमीशन मिळते. यासाठी दुकानदार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या प्रादुर्भावात काम करतोय.दुकानाचे भाडे, वायफाय बिल, कामगारांचे पगार या सर्वांची चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे या दुकानदारांना आर्थिक संरक्षण मिळणे गरजेचे आहे तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय संरक्षणही मिळायला पाहिजे. सरकारने तमिळनाडूच्या धरतीवर दुकानदारांना महिना वेतन सुरू करावे म्हणजे भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वाळके यांनी निवेदनात केली आहे.