Pimpri: पालकमंत्री शहरात फिरकत नसल्याने साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – प्राधिकरणातर्फे सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला आहे खरा परंतु, पालकमंत्री शहरात फिरकतच नसल्याचा आरोप करत हा उड्डाणपूल दोन दिवसात वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

सांगवी ते रावेत हा बीआरटीएस रस्ता पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला जो़डणारा आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणाराही हा प्रमुख बीआरटीएस मार्ग आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळेसौदागर आणि पिंपळेनिलख या दोन्ही परिसराला महत्व प्राप्त करून देणारा हा प्रमुख बीआरटीएस मार्ग आहे. त्यामुळे या बीआरटीएस मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.

या मार्गावर पिंपळेनिलख येथे साई चौकात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे जंक्शन आहे. त्यामुळे या चौकात वाहनचालकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या अभियंता व इतर चाकरमान्यांना जाता-येता साई चौकातील वाहतूककोंडीमुळे प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. सध्या उड्डाणपुलाच्या दोनही बाजुचे काम पूर्ण झाले आहे.

या चौकातील वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेऊन भाजपने उड्डाणपुलाची दुसरी बाजूही नागरिकांसाठी तातडीने खुली केली. मात्र, पिंपरी-चिंचवडकडे फिरकतही नसलेले पालकमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते उड्डाणपुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला आहे. प्राधिकरण प्रशासनावर दबाव आणून वाहतुकीसाठी खुली केलेली उड्डाणपुलाची दुसरी बाजू राष्ट्रवादीने बंद करून टाकल्याचा आरोपही अमोल थोरात यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.