Pimpri: महापालिकेचे निवारा केंद्र ठरतेय बेघरांचा आसरा
6 केंद्रात 213 बेघरांची सोय
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील बेघर असणा-या व्यक्तींना तात्पुरता निवारा देण्यासाठी 11 ठिकाणी निवारा केंद्र निर्माण केले आहेत. त्यापैकी सहा केंद्रात 213 नागरिकांना ठेवण्यात आले आहे.
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आलेल्या मदतीतून या नागरिकांना महापालिकेमार्फत जेवण पुरविले जाते. यामुळे बेघरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवारा केंद्रात शहर सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
लॉकडाउनमुळे सर्वजण घरी सुरक्षित असताना बेघर, काम धंदा गेलेल्या व्यक्तींच्या आस-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शहरात अडकलेले, रस्त्याच्या बाजूला राहणारे, शहर सोडून चाललेल्या व्यक्ती अशांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी 11 ठिकाणी केंद्र तयार करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या आठ प्रभागात असलेल्या 11 शाळांमध्ये निवारा केंद्र करण्यात आले आहे. त्यातील सहा निवारा केंद्रात आज 213 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. या निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना चहा, नाश्ता आणि दोन वेळा जेवण देण्यात येत आहे.
”शहरात फिरणारे, शहर सोडताना पोलिसांच्या नाकाबंदी मध्ये सापडलेल्या व्यक्तींसाठी निवारा केंद्र केले आहेत. शहरातील 11 शाळांमध्ये केंद्र सुरु केले आहेत. त्यातील सहा केंद्रात 213 जणांना ठेवले आहे. त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिळणारे जेवन या नागरिकांना दिले जात आहे. मनोज लोणकर – सहायक आयुक्त