Pimpri : पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता

मनीषा वाहिले यांना पर्यावरण मित्र तर प्रदीप वाल्हेकर यांना जलमित्र पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – पवना जलदिंडीचा समारोप उत्साहात झाला. विविध क्षेत्रांतील नदीप्रेमींनी यावर्षीच्या दोन दिवसीय जलदिंडीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीच्या शिक्षका मनीषा वाहिले यांना पर्यावरण मित्र पुरस्कार तर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर यांना जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जलदिंडीच्या समारोप कार्यक्रमासाठी आयपीएस अनंत ताकवले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, सुशील अगरवाल, डाॅ. विश्वास येवले, व्यंकटेश भताने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, निर्मला कंदेगावकर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात पर्यावरण मित्र आणि जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पवना जलदिंडी 2019 ची सुरुवात शुक्रवारी (दि. 20) रोजी पवनानगर येथून झाली. यावेळी परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, लायन्स कल्ब फिनिक्स यांनी सहभाग घेतला. अनेक गावांमधून जाणाऱ्या पवना नदीच्या घाटांवर या जलदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गोडुंब्रे गावातील पवना घाटावर ‘पवनामाई महोत्सव’ भरविण्यात आला. यामध्ये देखील अनेक नदी प्रेमींनी सहभाग घेतला. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. 21) तब्बल 250 जणांनी सायकल चालवून या जलदिंडीचे स्वागत केले. चिंचवड ते साळुंब्रे हा प्रवास सर्वांनी सायकलवरून केला.

समारोप दुपारी चिंचवड येथे शालेय विद्यार्थ्यांनी ‘नदी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या विषयावर रॅली काढली. या समारंभास प्रमुख पाहुणे पासपोर्ट रिजनल ऑफिसचे प्रमुख अधिकारी आयपीएस अनंत ताकवले उपस्थितीत होते. त्यांनी जलदिंडीत सकाळी साळुंब्रे ते मामुर्डी पर्यंत प्रत्यक्ष बोटीतून प्रवास केला व त्याच्या मनोगतात नदी प्रदूषणाबद्दल खेद व्यक्त केला व विद्यार्थ्यांमध्ये संविधान व नागरीकशास्त्राबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे व प्रदूषणावर लढा देण्याची तयारी करावी, असे प्रतिपादन केले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा सर केला होता. त्यांना दादोजी कोंडदेव यांची मोठी मदत झाली. नदी स्वच्छतेच्या कामात मोठ्यांनी दादोजी कोंडदेव यांची भूमिका घ्यावी. कारण हा तरुणांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे ताकवले यांनी सांगितले. नदी विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे यावेळी बक्षीस वितरण झाले.

डाॅ. विश्वास येवले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विचारांबरोबर कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी उपासना व आराधना यातील फरक सांगितला. ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी सुमारे 11 वर्षांपूर्वी पवना जलदिंडीची सुरुवात डाॅ. विश्वास येवले यांनी केली. आज त्यावर अनेक सामाजिक संस्था नदीवर येऊन काम करत आहेत, याचे समाधान व्यक्त केले.

जलदिंडी ही संस्था गेली एक तप पवना नदीवर काम करत आहे. या संस्थेच्या प्रेरणेतून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने ‘स्वछ सुंदर जलपर्णी मुक्त सांडपाणी व प्रदुषण विरहित पवनामाई – उगम ते संगम’ हे अभियान सुरु केले. त्यांनी केलेले पवना नदीच्या स्वच्छतेचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे क्लबचे प्रदीप वाल्हेकर यांना जलमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने समारंभाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.