Pimpri: कोरोनाबाबत तथ्य आणि गैरसमज

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसंदर्भात  नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी कोरोनाविषयी समज आणि गैरसमजांसंदर्भातील माहिती प्रकाशित केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकवर माहिती शेअर केली आहे.

कोरोनासंदर्भात समज आणि गैरसमज

 गैरसमज – उष्णता वाढल्याने कोरोना विषाणू रोखण्यास मदत मिळेल?

तथ्य – कोरोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या सर्व क्षेत्रात पसरु शकतो. स्वत:चे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण आणि पाणी वापरुन स्वच्छ धुणे. खोकताना आणि शिंकताना नाकावर रुमाल धरणे आणि गर्दीची ठिकाणे टाळणे.

गैरसमज – गरम पाण्याने आंघोळ केल्याने नवीन कोरोना  आजार रोखता येईल?
तथ्य  – आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. या तापमानात हे विषाणू आपल्या शरिरात संचार करु शकतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होणार नाही.

गैरसमज – कच्चे लसूण, तीळ खाल्ल्याने विषाणूपासून बचाव?
तथ्य  – लसणाचे अनेक फायदे आहेत. परंतु, लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळत नाही.

गैरसमज – न्यूमोनियाविरोधात वापरण्यात येणारी लस कोरोना विषाणूपासून आपले रक्षण करेल?
तथ्य   – न्यूमोनियाविरोधात देण्यात येणारी लस तुमचे न्यूमोनियाविरोधात नक्कीच संरक्षण करील. परंतू,  न्यूमोनियाविरोधात देण्यात येणाऱ्या लसीमध्ये  कोरोना विषाणूविरोधात लढण्याची क्षमता नाही.

गैरसमज – डासांच्या दंशाद्वारे कोरोनाची बाधा होऊ शकते?
तथ्य – कोरोना विषाणू डासांच्या द्वंशाद्वारे पसरु शकत नाही. तो  बाधित व्यक्तीच्या खोकण्यातून,  शिंकण्यातून, लाळेच्या थेंबातून किंवा नाकातील स्त्रावाद्वारे पसरतो.

गैरसमज – शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव लावल्याने करोना विषाणूला रोखता येऊ शकते?
तथ्य –  शरीरावर, कपड्यांवर अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव लावणे किंवा मद्यपान करणे कोरोना विषाणूची बाधा होण्यापासून वाचवू शकत नाही. नाक किंवा तोडावाटे विषाणू आपल्या शरीरात जेव्हा शिरकाव करतात तेव्हा आजार पसरला जातो.  दूषित हाताने तोंडाला स्पर्श करतो किंवा अन्न खातो तेव्हा बाधा होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी वारंवार आपले हात साबण व पाणी वापरुन स्वच्छ धुवा, देणेकरुन आपण विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकतो.

गैरसमज – मिठाच्या द्रावाने नियमितपणे नाक साफ केल्यास संसर्ग टाळता येईल?
तथ्य   – नाक सलाईनद्वारे सातत्याने साफ केल्यास सर्दी लवकर बरी होण्यास मदत मिळते. परंतू, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.