Pimpri : मनसे ‘ईव्हीएम’ विरोधात मोठी चळवळ उभी करणार – बाळा नांदगावकर

एमपीसी न्यूज – लोकशाही वाचविण्यासाठी ‘ईव्हीएम’ विरोधातील आंदोलनाचा खटाटोप चालला आहे. सध्या लोकशाही ज्या पध्दतीने दडवली जाते. त्याला विरोध करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेले लोकशाहीचे हे शस्त्र वापरने व जनमताने प्रदर्शित करणे आवश्यक असून ‘ईव्हीएम’ विरोधात मोठी चळवळ उभी करणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोमवारी (दि. 12) पिंपरीत बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मनसेचे नेते अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, महिला सेनेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता, शहराध्यक्ष सचिन चिखले, राजु साळवे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, अश्विनी बांगर, हेमत डांगे तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नांदगावकर म्हणाले, “लोकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांचे कर्तव्य केले. त्यासाठी अफाट खर्च केला. पण, त्यांचे भवितव्य ‘ईव्हीएम’ ठरवत असेल. तर, त्याला काही अर्थ नाही. आत्तापर्यत ज्या ठिकाणी ‘ईव्हीएम’ शिवाय निवडणुका झाल्या आहेत. त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष पराभूत झाला आहे. त्यामुळे या शंकेला वाव आहे. 21 तारखेला ‘ईव्हीएम’ विरोधात मोर्चाचे नियोजन केले होते. परंतु, सध्या पुराची परिस्थिती पाहता मोर्चा पुढे ढकलला आहे’.

अनिल शिदोरे म्हणाले, “निवडणूक आयोगाकडे असलेल्या 20 लाख मतदान यंत्राचा हिशोब नाही. 371 मतदान केंद्रामध्ये 56 लाख मतांच्या मोजणीत फरक आढळला आहे. ही सगळी यंत्रे कुठे होती. याबाबत शंका आहे. प्रगत देशानी मतदानासाठी ‘ईव्हीएम’ या यंत्राचा वापर बंद केला आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करुन काम करता येते हे सिद्ध करण्याचे आव्हान आम्ही घ्यायला तयार आहोत”

अविनाश अभ्यंकर म्हणाले, “सध्या देशात कोणाचीही लाट असली. तरी, ‘ईव्हीएम’ विरोधात आवाज उठवणारे एकमेव नेते राज ठाकरे आहेत. ‘ईव्हीएम’ विरोधातील आंदोलन देशव्यापी आहे”

राजेंद्र वागस्कर म्हणाले, “ईव्हीएम’ विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातून अधिक कामे करायची आहेत. राज ठाकरे यांची भूमिका व विचार जनतेपर्यंत पोचवण्याचे काम मनसैनिकांनी करावे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.