Pimpri news : वाढीव वीज बिलांबाबत उद्योगनगरीतील उद्योजक, व्यापा-यांमध्ये संभ्रमावस्था
बीले सुधारित करून सवलत देण्याची मागणी
एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकाने, औद्योगिक आस्थापना बंद असतानाही भरमसाठ वाढीव वीज बिले आल्याने उद्योजक, व्यापा-यांमध्ये संतापाची भावना आहे. सुमारे 50-50 टक्के वाढीव बिले आली आहेत.
राज्य सरकारने वाढीव बिले सुधारित करून आणि सवलत देण्याची घोषणा केली. पण, सहा दिवसांतच त्यावरून घुमजाव केला. यामुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिने दुकाने बंद होती. चुकीची आणि अवास्तव वीज बिले आली आहेत. ती कमी करून देण्याची मागणी, उद्योजक, व्यापाऱ्यांची आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे औद्योगिकनगरीतील दुकाने सुमारे तीन महिने पूर्णपणे बंद होती. दुकाने बंद असल्याने कामगार देखील आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे दुकानाची वीज बिले कमी येणे अपेक्षित होते. पण, दुकाने बंद असतानाही अवास्तव बिले आली आहेत. महावितरणने प्रत्यक्ष जागेवर येवून मिटिंग रिडींग घेतले नसल्याचा सर्वांचा आक्षेप आहे. त्यामुळेच भरमसाठ वाढीव वीज बिले आल्याचा आरोप केला जात आहे.
रस्त्यावर उतरणार – संदीप बेलसरे
पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, लॉकडाऊन झाल्यानंतर औद्योगिक संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली होती. वापरलेल्या विजेचे बील सोडून जे चार्जेस आहेत. ते लॉकडाउन काळात आकारु नयेत. त्यामध्ये स्थिर आकार, पॉवर फॅक्टरीची पॅनल्टी, इंधन अधिबार, लावण्यात येवू नयेत. अशी मागणी केली होती. सरकारने ती मान्य केली. पण, उद्योग चालू झाल्यानंतर जून महिन्यात सरासरी बिले आली. त्यामध्ये मागच्या तीन महिन्यातील विज वापराच्या हिशोबाने बिले आली.
मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल, मे महिन्यात विजेचा लघुउद्योग कंपन्यांनी काहीच वापर केला नव्हता. लॉकडाऊनमध्ये स्थिर आकार, वीज दरातही वाढ केली. त्यामुळे बिले वाढीव का येतात हे नागरिकांना समजलेच नाही. त्यामुळे आणि सरासरी बिलांमुळे वाढीव बिले आली. स्थिर आकार लावणार नसल्याचे सांगितले. पण, ऑगस्टपासून आकार लावून बिले आकारली. सरासरी आणि मीटर रिडींगनुसार दर आकारल्यामुळे एकत्रित दुप्पट बिले आली. स्थिर आकारसह इतर आकाराची व्याजासकट वसुली चालू केली आहे. त्याला विरोधही केला. पण, त्यावर काही केले नाही. त्यानंतर जी बिले दुरुस्त होऊ शकतात. ती करा, जी होत नाहीत. ती सक्तीने वसूल करा असा आदेश सरकारने काढला आहे. हा अन्यायकारक आहे.
घरगुती ग्राहकांचे वीज तोडत नाहीत. पण, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी जातात. हा भुर्दंड भरायचा कोठून, तो भरायला पैसे नाहीत. व्याजासकट बील वसुली चालू केली आहे. सगळा गोंधळ चालू आहे. काही लघुउद्योजकांनी बिले भरली देखील आहेत. वाढीव बिलांमधील आकार कमी करा, दरवाढ मागे घ्यावा आणि लोकांना दिलासा द्यावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. कोरोनामुळे आम्ही शांत बसलो. आता आक्रमक होऊन आंदोलन करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
व्यापारी संकटात, सरकारने मेहरबानी करावी – चंदुलाल चौधरी
कासारवाडीतील आई माता मंदिराचे अध्यक्ष, व्यापारी चंदुलाल चौधरी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद होती. तरी देखील वीज बिले जास्त आली आहेत. वाढीव बिले दुरुस्त करुन देणे आवश्यक आहे. सरकारने तेवढी तरी मेहरबानी करावी. लॉकडाउनमुळे नागरिक अडचणीत आहेत. आता कुठे उद्योगधंदे सावरु लागले आहेत. परत लॉकडाउनची अफवा उठते. त्यामुळे कामगार धास्तवत असून गावी जातो म्हणतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. व्यापारी अडचणीत आहे. वाढीव वीज बिलांमध्ये सरकारने सवलत दिलीच पाहिजे.