Pimpri News : भारतातील सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देण्यास सक्ती करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – डॉक्टर लिहून देत असलेल्या आणि जेनेरिक औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर फरक असतो. जेनेरिक औषधे स्वस्त असतात त्यामुळे महागड्या औषधांचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांसाठी जेनेरिक औषधे हा उत्तम पर्याय आहे.

मात्र, याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने नागरिक याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे भारतातील सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देण्यास सक्ती करावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे त्यांनी याबबात मागणी केली आहे. या पत्रात बाबर यांनी असे म्हटले आहे की, भारत प्रतिवर्ष 45 हजार करोड रुपयांची जेनेरिक मेडिसिनची निर्यात करतो परंतु, आपल्या देशातील नागरिकांना यापासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जेनेरिक औषधांचा वापर केल्यास विकसित देशांतील आरोग्यावरील खर्चात 70 टक्के कपात होऊ शकते. विकसनशील देशांत त्याहून जास्त बचत होऊ शकते. तसेच, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

पत्रात बाबर पुढे असे म्हणातात, जेनरिक औषधांबाबत आपल्या देशातील लोकांच्या मनात अनेक समज -गैरसमज आहेत ते दूर करणे आवश्यक आहेत. प्रसारमाध्यमातून जेनरिक औषधांचा प्रसार करावा यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहचू शकते. भारतातील सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देण्यास सक्ती करावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.