Pimpri News: मंत्रालयातून महापालिकेचे अधिकार काढले जाताहेत – आशिष शेलार

पीसीएनटीडीएचे विलीनीकरण करुन ‘भूखंडाचे श्रीखंड पार्ट टू’ ची मुहूर्तमेढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे 50 हजार कोटी रुपयांचे भूखंड एका रात्रीत वळविले. यात घोटाळा होऊ घातला आहे. पीसीएनटीडीएचे पीएमआरडीए मध्ये विलीनीकरण म्हणजे ‘भूखंडाचे श्रीखंड पार्ट टू’ ची मुहूर्तमेढ असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तसेच महापालिकेला बळ द्यायचे सोडून मंत्रालयात बसून महापालिकेचे अधिकार काढून घेतले जात आहेत. हे संविधानाला अपेक्षित नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आरोप करणाऱ्यांना 1 हजार कोटी रुपयांची बदनामीची नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये आता चालणार नाहीत.

महापालिकेत भाजपची सत्ता म्हणजे सूज असल्याच्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना शेलार म्हणाले, भाजपची सूज आहे. तर, शिवसेनेचा महापालिकेतील नगरसेवकांचा 9 चा आकडा भूज आहे का, 9 नगरसेवक असलेली शिवसेना आगामी महापौर आमचाच करणार असे सांगत आहे. बेडकाने कितीही फुगायचा प्रयत्न केला. तरी, त्याची गाय, बैल होऊ शकत नाही अशी टीकाही शेलार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.