Pimpri news: अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादीकडून कौतुक ; भाजपकडून निषेध

एमपीसी न्यूज – महिला, शालेय विद्यार्थिनींसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेव्दारे महिला दिनी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्त्री शक्तीला अनोखी भेट दिली आहे. तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून देशभरातील नागरिकांची निराशा झाली होती. राज्यातील नागरिकांची ही निराशा दूर करणारा राज्यातील सर्व घटकांचा, सर्व भागांसाठी भरीव तरतुदी असलेला हा सर्वसमावेशक असा महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर, अर्थसंकल्पात मातंग समाज दुर्लक्षित असल्याची टीका करत भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पाचा निषेध केला आहे.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज सादर केला.‌ या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना एसटी बसचा मोफत प्रवास, तसेच महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेव्दारे महिलेच्या नावावर घर घेतल्यास नोंदणी शुल्कात 1 टक्का सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाची 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी करण्याची घोषणा अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

याबरोबर आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हानिहाय विविध उपाययोजना करून आरोग्य सुविधा सक्षमीकरणावर भर देत जनसामान्यांच्या प्राथमिक गरजांवर लक्ष देणारे महाविकास आघाडी सरकार असल्याचे दाखवून दिले आहे.

शेतक-यांसाठी विविध योजना जाहीर करत भरीव तरतुदीचा समावेश अर्थसंकल्पात केला आहेत. महाविकास आघाडी सरकारने रस्ते, रेल्वे प्रकल्प, भौतिक सुविधांना गती देण्याबरोबर सर्व घटकांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प राज्याला दिला आहे. आयटी पार्क उभारण्याचा निर्णय हा राज्यात मोठा रोजगार निर्माण करणारा आहे. पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाची घोषणा केली असून त्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

औंध येथे रुग्णालयासाठी तरतूद केलेली आहे. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. पुण्यात क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केलेली आहे. या योजनाचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे.

यासह जिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण, कर्करोग निदान सुविधा, एसटी बस आगारांचा विकास, धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. अशा प्रकारे सर्व घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे संजोग वाघेरे-पाटील यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात मातंग समाज दुर्लक्षित – अमित गोरखे

महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला परंतु मातंग समाजासाठी अत्यंत आवश्यक असणारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी कोणतीही घोषणा केली नाही. शिवाय आण्णा भाऊ साठे यांच्या जयंत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यासाठी ही तरतूद केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध.

अर्थससंकल्पात मातंग समाजाला जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला आहे.

मातंग समाजासाठी कोणतीही तरतूद नाही. मातंग समाजामध्ये अस्वस्थता आहे.  समाजाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थपुरवठा करणारे महामंडळ दुर्लक्षित ठेवले आहे. तसेच पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही अजिबात तरतूद केली नाही.

मुंबई येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे चिरागनगर येथील राष्ट्रीय स्मारकासाठीही तरतूद नाही. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाबाबत   धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे या जातीयवादी मानसिकता असणाऱ्या सरकारचा संपूर्ण महाराष्ट्र भर आम्ही निषेध करणार असल्याचे अमित गोरखे यांनी जाहीर केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.