Pimpri news: लघुउद्योगांना पॅकेज जाहीर करावे : अभय भोर
एमपीसी न्यूज – सुरक्षेला महत्त्व देऊन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्व उद्योजक आपले उद्योग बंद ठेवण्यास तयार आहेत. परंतु, या काळामध्ये उत्पादनाचा पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे अनेक उद्योजकांना याचा दंड देखील होणार आहे. त्यासाठी सरकारने लघुउद्योगांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
याबाबत भोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात आज रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. पुढील 15 दिवस संचारबंदी असणार आहे. या काळामध्ये उत्पादनाचा पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे अनेक उद्योजकांना याचा दंड देखील होणार आहे.
पुरवठा न केल्यामुळे त्याचा परिणाम भांडवली गुंतवणुकीवर होणार आहे. निर्यात उशिरा होतील आणि त्याचे पेमेंट उद्योजकांना उशिरा मिळेल.
या काळामध्ये बँकांची देणी तसेच इतर शासकीय देण्यांमध्ये उद्योजकांना सवलत देण्यात यावी. जेणेकरून उद्योगांना अडचण होणार नाही. अनेक कामगारांचे पगार हे वेळेवर उत्पादन न पुरवल्यामुळे थकीत होण्याची शक्यता आहे.
याचा शासनाने विचार करावा आणि उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भोर यांनी केली आहे.