Pimpri News: राज्यातील शाळांमध्ये आता 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक

राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून राज्यातील शाळा प्रत्यक्षात बंद आहेत. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये नियमित वर्ग घेण्यासाठी बंदच राहणार आहेत. पण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षणाशी संबंधित कामासाठी 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कोविड 19 जागतिक महामारीमुळे देशात मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर गर्दी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे दहावी व बारावीसह काही वर्गांच्या परीक्षा सोडून इतर वर्गांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्याही परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आता परीक्षा घेण्यात येत आहेत. अद्याप शाळा प्रत्यक्षात सुरू नाहीत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थिती राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरु करणे शक्य नसल्याने स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त याच्या सहाय्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळांमध्ये शिक्षकाच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाच्या स्वरूपाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी महसूल व वन विनागाने सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांनुसार शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यासाठी सहमती दिली आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी, नियमित वर्ग घेण्यासाठी बंदच राहणार आहेत. मात्र, ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विना अनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना!

शाळेत आत येताना आणि बाहेर पडताना सुरक्षित अंतर बाळगावे

वयोवृद्ध कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी व जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत. त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ नये. या कारणांसाठी शिक्षकांना विना अडथळा रजा मंजूर करावी.

शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

शाळा परिसरात झाकलेल्या / बंदिस्त कचराकुंड्या मुबलक प्रमाणात असाव्यात. शिपाई व कर्मचाऱ्यांवैयक्तिक सुरक्षेसाठी वापरलेल्या वस्तूंची व्हिल्हेवाट योग्यरित्या करावी.

शाळेत मोक्याच्या ठिकाणी शारीरिक अंतर संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे स्टिकर लावावेत.

थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा विद्यार्थी संशयित आढल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे. वेगळी खोली उपलब्ध नसल्यास इतर उपयुक्त विकाणी ठेवून त्यास लवकरात लवकर घरी पाठवावे. पुढील उपचारासाठी सहकार्य करावे.

तात्काळ रुग्णालय किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास कळवावे. त्यानंतर सर्व परिसराचे, जागेचे निर्जंतुकीकरण करावे

कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी कोविड -19 ने बाधित असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये.

चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदविणाऱ्या किंवा सांगणा-या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी समुपदेशन करण्याची व्यवस्था करावी.

शिक्षकांनी, शालेय समुपदेशकांनी आणि शालेय आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व आपले मानसिक स्थैर्य निश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.