Pimpri News : राज्य शासन पूर्णतः गोंधळेल्या अवस्थेत; प्रदीप नाईक यांची राज्य सरकारवर टीका
एमपीसी न्यूज – शासनाने घेतलेला एकही निर्णय पूर्णत्वाला जात नाही. कारण हे निर्णय विचारांती नसतात. म्हणूनच महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, राज्य शासन पूर्णतः गोंधळेल्या अवस्थेत आहे, अशा शब्दांत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
लॉकडाऊनचा निर्णय देखील असाच एक निर्णय आहे व शासनाने याच्या परिणामांचा विचार केलेला दिसत नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
प्रदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच एक निवेदन पाठविले. यामध्ये त्यांनी लॉकडाऊन विषयी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. ‘लोकं लॉकडाऊनला कंटाळली आहेत. लोकं घरातच रहायली तर बेकारी, बेरोजगारी, गरीबी यातून येणारी उदासीनता, वैफल्यग्रस्तपणा, आत्महत्या, कौटुंबिक कलह तसेच, आर्थिक, सामाजिक प्रश्न निर्माण होतील याचा शासनाने विचार केलेला दिसत नाही.’
‘रिक्षाचालकांना दिवसाला पन्नास रुपये शासनातर्फे मदत जाहीर झाली. चार जणांच्या कुटुंबाला हे पन्नास रुपये पुरणार कसे ? त्यांच्या कुटुंबीयांनी पन्नास रुपयांचे चणे खाऊन झोपायचे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने राज्यातल्या गोरगरिबांची क्रूर थट्टा चालविली आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा आहे. व्हेंटिलर बेड उपलब्ध नाहीत, रुग्ण तडफडून जीव सोडत आहेत. हे कधी थांबणार आहे?’ असा उद्विग्न सवाल प्रदीप नाईक यांनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.