Pimpri News : ‘पवना नदीपात्रातील प्रदूषणाबाबत कारवाई करा’

माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांची उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पवना नदीपात्रात मैलायुक्त सांडपाणी मिसळत असल्याने जलप्रदूषण होत आहे. प्रदूषणाकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी केली आहे.

याबाबत गोलांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि इतर भागांत पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. पवना नदीपात्रालगत पवन मावळ आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट भागांत बहुमजली इमारतींची संख्या वाढली आहे‌.

या भागात सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची कोणतीही खबरदारी घेतली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मैलायुक्त सांडपाणी पवना नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवनेचे पाणी प्रदूषित होत असून, नदीची वाटचाल मृतावस्थेकडे होते आहे.

प्रदुषणामुळे नदीतील जलचर मरण पावत आहेत. या पाण्यामुळे नागरिकांनाही कावीळ, कॉलरा आणि अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या प्रदुषणाकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी गोलांडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनाही पत्राची प्रत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.