Mumbai : घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकला, भाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नका; राज्य सरकारच्या घरमालकांना सूचना
एमपीसी न्यूज – लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. या कालावधीत घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील सर्व घर मालकांना दिल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (शुक्रवारी) परिपत्रक काढले आहे. यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
जगभरात कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन सद्यस्थितीत 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकाडऊनमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखानेसह सर्व आर्थिक, व्यावसाय बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे.
या अभुतपुर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या समस्येबरोबरच अत्यंत कठिण अशा आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे. राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणा-या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमध्ये भाडेकरुंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही. भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.
या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. या कालावधीत घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात आल्या आहेत. यामुळे भाडेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.