Pimpri : पाऊस लवकर पडावा यासाठी नमाज पठणप्रसंगी आल्लाहजवळ प्रार्थना
एमपीसी न्यूज – राज्यात दुष्काळामुळे पाण्यासाठी नागरिकांना दाही-दिशा करावी लागते. धरणातील पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. अनेक विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. काही विहीरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांना देखील चारा आणि पाण्याची वणवण सर्वत्र दिसून येत आहे. राज्यात पाऊस पडावा, पाण्याचे संकट दूर व्हावे, यासाठी चिंचवड स्टेशन येथील मजीद समा-ए दिन आदब या मशीदीमध्ये शुक्रवारच्या पवित्र नमाज निमित्त आल्लाह जवळ पाऊस लवकर पडावा, यासाठी मौलाना मोहसीन सय्यद यांच्यासमवेत सुमारे 300 मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली.
रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे.
- रमजान महिन्याच्या शुक्रवारच्या नमाजचे फार महत्त्व असते म्हणून मौलाना मोहसीन सय्यद यांनी दिलेल्या संदेशात परोपकार करा, संकटग्रस्तांना मदत करा, आई-वडिलांच्या आदेशाचे पालन करा. त्यांच्या आनंदात मुला-मुलींनी आपले आनंद मानावे. त्यांना दुखवू नये, आपापसात भाईचारा ठेवावा आणि शांतीपूर्ण आपले जीवन जगावे, असा ही संदेश देताना सध्या महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ असून पाऊस लवकर पडावा. जेणेकरून सर्वांची समस्या दूर होईल यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मौलाना जुबेर अंसारी, मशीदीचे अध्यक्ष अब्दुलकदीर अत्तार, अब्दुलअजीम अत्तार आदी उपस्थित होते.