Pimpri : रिक्षाचालकांना अन्नधान्य व आर्थिक मदत द्या ; छावा मराठा संघटनेच्या राम जाधव यांची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची समाजातील प्रत्येक घटकाला झळ सोसावी लागत आहे. यातून रिक्षाचालकही सुटलेले नाहीत. बहुतांश रिक्षा व्यवसाय बंद असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील जवळपास ऐंशी हजाराहून अधिक रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांना आर्थिक मदत आणि अन्नधान्याची मदत करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम जाधव यांनी केली आहे.

याबाबत राम जाधव यांनी सांगितले, की सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी भारतातही लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच बाबतीत मर्यादा आलेल्या आहेत. शासनाने रिक्षालाही बंधने घातली आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी रिक्षामध्ये फक्त एकाच प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे.

तसेच रिक्षा स्टँडवरही दोन तीन रिक्षा उभ्या करू दिल्या जातात. पोलिसांच्या या आवाहनाला रिक्षाचालक पूर्ण सहकार्य करीत आहेत. मात्र, संपूर्ण संचारबंदीमुळे प्रवाशीच नसल्याने रिक्षा बंद ठेवाव्या लागत आहेत. परिणामी रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

शहरात साधारण ऐंशी हजार रिक्षा आहेत. एका रिक्षावर अवलंबून असलेले चार लोक पकडले तरी सव्वातीन ते साडेतीन लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या लोकांना आज आधाराची गरज आहे. दैनंदिन खर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते, घरभाडे यासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न रिक्षा चालकांना सतावत आहे.

या संकटातून वाचविण्यासाठी रिक्षा चालकांना शासनाने अन्नधान्य व आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी राम जाधव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.