Pimpri: शहरवासियांना दिलासा; पाणीकपात रद्द, आता पाणी पुरवठा नियमित होणार

दररोज पाणी पुरवठा करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना; महापौरांनी केले पवनामाईचे पूजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला. त्यामुळे पाच महिन्यांपासून सुरु असलेली पाणीकपात रद्द झाली असून शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजमितीला पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत असून पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

  • पिंपरी महापालिकेने 1 मार्च 2019 पासून विभागनिहाय एकदिवस पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतरही पाण्याच्या तक्रारी येत असल्याने त्यामध्ये वाढ करत 6 मे पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. तब्बल 25 टक्के पाणीकपात केली होती. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने तक्रारी कमी झाल्या. पाणी जास्त दाबाने येऊ लागले. उंचावरील गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये पाणी पोहचत होते. आता धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे, पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.