Pimpri : देशातील जनतेचा हुकूमशाहीला गर्भित इशारा – सचिन साठे

एमपीसी न्यूज – राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे. या यशाच्या माध्यमातून या पाच राज्यातील जनतेने देशातील हुकूमशाहीला गर्भित इशारा दिला आहे, असे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणूकांच्या निकालाचा आनंद काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून व्यक्त केला. 

सचिन साठे म्हणाले, या पाचही राज्यातील जनतेने भाजपाला नाकारले आहे. मागील साडेचार वर्षात प्रधानसेवक म्हणवून घेणा-या पंतप्रधानांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु झाली होती. पक्षातील वरिष्ठांसह विरोधी पक्षांना देखील अपमानास्पद वागणूक देण्याचे मोदींचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यांच्या एककल्ली व हुकूमशाही राजवटीला कंटाळून कालच रिजर्व्ह बॅंकेच्या गर्व्हनरांनी आणि आज उपगर्व्हनरांनी राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना देखील माध्यमांसमोर येऊन गा-हाणे मांडण्याची वेळ देशाच्या इतिहासात प्रथमच घडली.”

साठे पुढे म्हणाले, “माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी 1991 साली केलेल्या ‘गॅट’ करारानुसार देशाची अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करीत असताना मोदींनी दोन वर्षांपुर्वी उत्तर प्रदेशातील निवडणूकीमध्ये विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने देशातील 125 कोटी जनता, केंद्रिय मंत्रीमंडळ, रिझर्व्ह बॅंक आणि आरबीआयच्या गर्व्हनरांना देखील अंधारात ठेवून नोटाबंदीची घोषणा करुन ताबडतोब अंमलबजावणी केली. यामुळे देशभर अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. नोटा बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत अनेकांना जीव गमवावा लागला. देशातील छोटे, मोठे, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी, गृहिणी महागाईने त्रस्त झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करु असे सांगणा-या मोदींनी नोटाबंदी केल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली.”

‘मेक इन इंडिया’चा फसवा फुगा फुटला आहे. साडेचार वर्षातील अपयश झाकण्यासाठी ‘राममंदिराचा’ मुद्दा या पाचही राज्यातील विधानसभा निवडणूकीत पुढे आणण्यात आला. सर्व समान्य जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होण्याएैवजी आहे तीच खात्यातील शिल्लक, जीएसटी व इतर करांच्या नावाखाली बँका कापू लागल्यामुळे जनतेच्या पैशांवर सरकारचा डोळा आहे, हे लक्षात आले. सरकारी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन मोदी, मल्ल्या परदेशात पळाले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार सामान्य जनतेला वेठीस धरु लागले आहे. हजारों कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करणा-या सरकारकडे शेतक-यांना, उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान देण्यासाठी पैसा नाही. कॉंग्रेसने सुरु केलेल्या ‘आधारकार्ड’ ला विरोधात असताना विरोध करणारे, मोदींनी सत्तेत येताच पॅनकार्ड, आधारकार्ड शिवाय नागरीकांचे जगणे मुश्किल केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही त्यांच्या डोळ्यावरील सत्तेची धुंदी उतरलेली नाही. भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीला देशातील पाचही राज्यातील जनतेने नाकारले आहे. पण आता 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मतदार त्यांना पुन्हा ‘चहा’ विकायला पाठवेल असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा येथील कार्यालयात आज तीन राज्यातमिळालेल्या अभूतपूर्व विजयच्या पेढे वाटून आणि घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला. ह्यावेळी सर्व उपस्थितांनी जनता जनार्धनचे आभार मानले, काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. पिंपरी चिंचवडच्या कारकर्त्यांमध्ये सुद्धा नवीन उत्साहाचा संचार झाला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगार बारस्कर, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, श्याम अगरवाल, जयराम शिंदे, सरिता जामनिक, दीपक थोरात, उमेश बनसोडे, राजेंद्र लोंढे (महाराज), संदेश नवले,आबा खराडे, नाझिया बारस्कर, वैशाली नलगे, जयश्री काननाइके उपस्थित होते

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने माननीय सोनियाजी गांधी यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य लाभण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे ह्यांनी कार्यकर्त्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथे महाभिषेक केला. तसेच महाराष्ट्राचे आराध्य जेजुरीच्या खंडोबा राया दैवत येथी हि महाभिषेक केला गेला तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष उमेश रानवडे ह्यांच्या वतीने आळंदीत अन्नदान आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम साजरी करण्यात आला. तसेच काँग्रेस पक्ष पर्यावरण विभागाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.