Pimpri: महापालिकेची सर्वसाधरण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे घ्या – भाऊसाहेब भोईर
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या साथीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधरण सभा तीन महिने झाली नाही. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्याने सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे’ घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
याबाबत नगरसेवक भोईर यांनी महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे महापालिका क्षेत्र दोन महिन्यांच्या कालावधी पेक्षा जास्त काळ बंद आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यामुळे जवळ जवळ सर्व अधिकार पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे गेले आहेत.
प्रशासनाकडून करोना साथीसंदर्भात घेतलया जाणाऱ्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील डॉक्टर, नर्सेस, इतर आरोग्यसेवक, पोलीस प्रशासन अहोरत्र परिश्रम करत आहेत.
महापालिकेची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप झालेली नाही. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका क्षेत्र जवळ जवळ संपूर्णपणे बंद असल्यामुळे, मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालू नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील संपूर्ण जनता आर्थिक विवंचनेत सापडली आहे. नागरिक महारपालिकेच्या करसंकलनात सूट मिळावी म्हणून मागणी करत आहेत.
कोरोना साथीमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महापालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
कोरोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. त्यात ही तांत्रिक कारणांमुळे काही अडथळे निर्माण होत असल्यास, शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी.
यामुळे सध्या लागू असेलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल आणि महानगरपालिकेला येऊ घातलेलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, असे भोईर यांनी म्हटले आहे.