Pimpri: शहराची वाट लागली, भ्रष्टाचार, गुन्हेगारीमध्ये वाढ; अजित पवार यांचा हल्लाबोल

धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही नागरिक पाण्यापासून वंचित; पाच वर्षात केंद्रासह सरकारचा एकही प्रकल्प शहरात आणला नाही

एमपीसी न्यूज – भाजपच्या राजवटीत पिंपरी-चिंचवड शहराची वाट लागली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यामध्ये तसेच नवीन मोठे प्रकल्प उभारण्यामध्ये युती सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. तसेच धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही नागरिक पाण्यापासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.

पाच वर्षात काहीही काम न करणा-या भाजप-शिवसेना युती सरकारचा विधानसभा निवडणुकीत पराभव निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे 175 आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत कासारवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, महापालिका, राज्य आणि केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असतानाही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यामध्ये तसेच नवीन मोठे प्रकल्प उभारण्यामध्ये युती सरकार अपयशी ठरले आहे.

गेल्या पाच वर्षात या सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना ‘कलम 370’ रद्द करण्याचा मुद्दा घ्यावा लागत आहे. समाजातील कोणताही घटक युतीच्या कारभारावर समाधानी नाही. त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत पराभव निश्चित आहे.

गेल्या 45 वर्षांमध्ये राज्यासह देशात जी बेरोजगारी, महागाई, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. त्याचे उत्तर 370 मधून मिळते का? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.