Pimpri: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याचा प्रश्न सोडविताना होतेय दमछाक – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणताना अनेक अडचणी येत आहेत. नव-नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. शेतक-यांचे प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढताना दमछाक होत असल्याचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न कायस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बापट यांनी आज (मंगळवारी) आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड शहर भाजप कोअर कमिटी आणि नगरसेवकांची बैठक बापट यांनी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, खादी व ग्राम विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य)चे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर, राजेश पिल्ले, उमा खापरे, महेश कुलकर्णी, शैला मोळक, बाबू नायर, माउली थोरात, संजय मंगोडेकर,  आदी उपस्थित होते.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत बोलताना बापट म्हणाले, धरणातील पाणी कधीच नळाला येत नसते. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणी आणणण्यात येणार आहे. महापालिकेने बाधित शेतक-यांच्या पुर्नवसनासाठी पैसे देखील दिले आहेत. परंतु, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची मर्यादित मुदत देता येणार नाही. अनेक अडथळे आहेत. शेतकरी न्यायालयात गेले आहेत. जागेचा प्रश्न आहे. असे अनेक अडथळे सोडविताना आमची दमछाक होत आहे. शेतक-यांची सहमती घेऊन पवना बंद पाईपलाईन योजना पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गिरीश बापट म्हणाले, केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 100 टक्के प्रश्न सोडविल्याचा आमचा दावा नाही. 60 ते 70 टक्के प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. मेट्रो, पालखी मार्ग, रिंगरोडचे काम सुरु असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी काळात उर्वरित प्रश्न देखील मार्गी लावले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.