Pimpri : विकासकामे करुनही पिंपरी महापालिकेतील सत्ता कशी गेली ? – शरद पवार

मावळ लोकसभा मतदार संघातील बुथप्रमुखांबरोबर शरद पवार यांनी साधला संवाद; 'मशिन'मध्ये गडबड झाल्याची व्यक्त केली शंका

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामे करुनही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता कशी गेली याची मला शंका आहे. ‘मशिन’मध्ये काही गडबड झाली असे मला वाटते, एवढे काम झाल्यावर नागरिक खूश असताना सत्ता जाणे सोपे नव्हते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या पालिकेतील विजयावर भाष्य केले. निकाल मान्य करत ते म्हणाले, आता लांबून, बघतो एकतो. पिंपरी महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे. मतभेद आहेत. सतत काही ना काहीतरी वाद असतात, असेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांबरोबर शरद पवार यांनी आज (बुधवारी) मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरसद्नारे संवाद साधला. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मावळचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेश सचिव उमेश पाटील, भाऊसाहेब भोईर, मावळचे तालुकाअध्यक्ष बबनराव भेगडे यांच्यासह बुथप्रमुख उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पदाधिका-यांनी चांगले काम केले. पुणे शहारपेक्षा पिंपरी शहरात चांगले काम करुन औद्योगिकनगरी अधिक चांगली केली. दुर्दैवाने फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत आपल्या हातून महापालिकेतील सत्ता गेली. सत्ता कशी गेली याची मला शंका आहे. मशिनमध्ये काही गडबड झाली असे मला वाटते. एवढे काम झाल्यावर नागरिक खूश होते. असे असताना सत्ता जाणे सोपे नव्हते. ठीक आहे निकाल मान्य केला आहे. आता लांबून, बघतो एकतो. पिंपरी महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे. मतभेद आहेत. सतत काही ना काहीतरी वाद असतात”

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह व्हावे. त्याकडे लक्ष द्यावे. जागरुक रहावे. खोटी बातमी आल्यास तातडीने खोडण्यात यावी. लगेच सोशलमिडीयातून उत्तर दिले पाहिजे. पण हे सगळे करताना कायद्याच्या चौकटीत काम करावे. कायद्याच्या उल्लंघन होऊ नये. याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “गेल्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन धनगर समाजाला आम्हाला सत्ता द्या, मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुम्हाला आरक्षण देऊ असे सांगितले. परंतु, आजपर्यंत आरक्षण दिले नाही. याउलट थातूर-मातूर गोष्टी करुन त्यांची फसवणूक केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. समाजातील सर्वंच स्तरातील लोकांना आश्वासन दिले. परंतु, एका आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदी अयशस्वी ठरली. नोटाबंदीने 15 लाख लोकांची नोकरी घालविली. त्यामुळे बेकारी वाढली आहे.

मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र, एका रुपयाचे काम देखील झाले नाही. सत्ताधारी पक्षाच्या कामावर लोक समाधानी नाहीत. भरपूर आश्वासने द्यायची आणि कोणत्याची आश्वसनाची पूर्तता करायची नाही, हे सरकारचे वैशिष्टये आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.