Pimpri: महापालिकेकडे वाघोली पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी 30 दशलक्षघनमीटर पाण्याची गरज आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पांसाठी कालावधी लागणार आहे. सध्या तरी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी – चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने तत्त्वत: मान्य केली केली आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना येत्या दोन महिन्यात पूर्ण झाल्यावर ‘वाघोली’ योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरीत करण्यास पुणे महापालिकेने संमती दिली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 30 हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड 135 लिटर प्रति माणसी प्रति दिन याप्रमाणे ठरविण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या आणि मापदंडाप्रमाणे वार्षिक 3.61 टीएमसी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या 20 लाखाच्या पुढे पोहोचली आहे.

त्यानुसार 6.55 टीएमसी मंजुर आरक्षणापैकी सध्या 4.84 टीएमसी इतका पाणीकोटा महापालिकेसाठी मंजुर आहे. 2008 साली महापालिकेला आणखी 1.31 टीएमसी पाणी कोटा मंजुर झाला. मात्र, महापालिकेची टप्पा क्रमांक 4 ही योजना अद्याप कार्यान्वित नसल्याने 4.84 टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे जादा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

पिंपरी महापालिकेचा सध्याचा प्रत्यक्ष वार्षिक पाणीवापर पाच टीएमसी इतका होत आहे. हा पाणीवापर आरक्षित पाणी क्षमतेपेक्षा जादा होत आहे. प्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पाण्याचा वापर मर्यादेत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा वितरण प्रणाली दुरूस्ती, पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, नवीन वितरणप्रणाली करणे आदी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. भविष्यात आपल्याला वाढीव पाणी मिळणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध होतात का याची चाचपणी सुरु केली असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधा-यातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. 27 एमएलडी क्षमतेच्या या योजनेद्वारे चिखली येथील 40 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाकीद्वारे पुणे महापालिका हद्दीतील गणेशनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, खराडी, खांदवेनगर या भांगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे 27 एमएलडी क्षमतेची वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेकडे केली आहे.

त्यावर पुणे महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्यास वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी महापालिकेस हस्तांतरण करणे शक्य असल्याचे पुणे महापालिकेने कळविले असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.