Pimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे

एमपीसी न्यूज – अध्यात्म, संस्कृती आणि लोकजीवन यांचे जवळचे नाते आहे. लोकजीवनात मंदिराचे स्थान महत्वाचे आहे. मंदिर हे ज्ञानाचे केंद्र आहे. मंदिरातील भजन, किर्तन प्रवचनांतून संस्कृतीचे आणि तत्वज्ञानाचे दर्शन सर्वसामान्यांना घडते, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगवीत केले.

नवी सांगवी येथे श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा व वास्तुशांतीनिमित्त ते बोलत होते. 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने ‘भारतीय संस्कृती आणि आदिशक्ती’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगुले, दत्त साई सेवा कुंभ आश्रमाचे प्रमुख शिवानंद स्वामी महाराज, हभप बब्रुवान वाघ आदी उपस्थित होते. यावेळी महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गळतगे, श्रीमानयोगी पतसंस्थेचे अध्यक्ष सखाराम रेडेकर यांचा विशेष सत्कार केला.

  • यावेळी देखणे म्हणाले की, “कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. एकत्र कुटुंब ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आई-वडिलांची सेवा करणे हा उत्तम संस्कार आहे. भक्तीमुळे सेवाभाव निर्माण होतो. भक्ताच्या सेवेमुळेच देवत्वाचे प्रगतीकरण होते. त्यासाठी माणसाची मानवतेकडून दिव्यतेकडे वाटचाल होण्यासाठी सदविचारांची आवश्यकता आहे.

मंदिराच्या वास्तुशांतीनिमित्त दुपारी कोल्हापूर पध्दतीने गारवा आणला. यामध्ये पारंपारिक वेषात महिला सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत अभिनेत्री पुजा पवार तसेच अश्विनी जगताप, नगरसेविका सीमा चौगुले, माधवी राजापुरे सहभागी झाल्या होत्या. यावेळी पै. आप्पा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. राजेंद्र राजापुरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.