Pimpri: 100 दिवसांत ‘शास्तीकर माफी’च्या घोषणेचे काय झाले? विरोधकांचा सवाल
एमपीसी न्यूज – भाजपने सत्तेत येणापूर्वी 100 दिवसांत सरसकट शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. उलट नागरिकांना नोटीसा पाठवून वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. तसेच सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा. शास्तीकर माफ होत नाही, तोपर्यंत शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
शास्तीकर 100 टक्के माफ करण्याच्या मागणीसाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत बाधित नागरिकांची गुरुवारी (दि. 18) बैठक आयोजित केली आहे. आकुर्डीत गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक होणार आहे. त्याची माहिती साने यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे उपस्थित होते.
- यावेळी साने म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृ बांधकाम केलेल्या नागरीकांकडून शास्तीकर (मिळकत कराच्या दुप्पट अधिक मिळकत) 31 मार्च 2008 पासून वसूल केला जात आहे. हा शास्तीकर म्हणजे रोगापेक्षा इलाज भंयकर असा प्रकार झाला आहे. शास्तीकर भरुन नागरीक मेटाकुटीस आले आहेत. शास्तीकर शंभर टक्के माफ करु म्हणून सत्ताधारी भाजपने राज्यात, महापालिकेत सत्ता मिळवली. परंतु, शास्तीकर शंभर टक्के माफ करु शकले नाहीत.