Pimpri: भाजपला विश्वासात न घेणा-या उमेदवाराचे काम का करायचे? -एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आपण फार लोकप्रिय नेते असल्याचा वारंवार भास होतो. त्यांच्या कार्यकर्त्यांना बारणे हे फार मोठे नेते असल्याची आणि ते नक्की खासदार होणार, अशी स्वप्ने पडतात. एवढीच लोकप्रियता होती आणि ते फार मोठे नेते होते. तर, महापालिका निवडणुकीत त्यांना चार नगरसेवक तरी निवडून का आणता आले नाहीत? असा पलटवार सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. तसेच भाजपला कधीही विश्वासात न घेणा-या उमेदवाराचे आम्ही काम का करायचे?, असा सवालही त्यांनी केला आहे.

भाजप नगरसेवकांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी वारंवार भाजपवर टीका केल्याचे सांगत त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नसल्याचे पत्र नितीन गडकरी यांना दिले. त्यावर राष्ट्रवादीला छुपी मदत करण्यासाठीच भाजप नगरसेवकांनी पत्रकबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर केला होता. त्याला एकनाथ पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

  • एकनाथ पवार यांनी म्हटले आहे की, खासदार बारणे हे नेहमी स्वतःच्या आत्मप्रौढी राजकीय विश्वात जगत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. बारणे यांनी मावळ मतदारसंघात कोणतेच काम केलेले नाही. केवळ पक्षांतर्गत भांडणे लावण्यातच त्यांनी खासदारकीची टर्म वाया घालवली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. जर मतदारांनी त्यांना नाकारले, तर भाजपचेही नुकसान होणार आहे. तसेच बारणे हे पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यास मोकळे होतील. जनतेत नाराजी असणा-या आणि भाजपला कधीही विश्वासात न घेणा-या उमेदवाराचे आम्ही काम का करायचे?, असा सवाल पवार यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.