Pimpri News : दळणवळण सुव्यवस्थित करण्यासाठी नियोजन करा; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भविष्यात उद्भवणाऱ्या पार्किंग समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करून दळणवळण सुव्यवस्थित करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले.दळणवळण विषयक व्यवस्थापन करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने पार्किंग समस्यवर दीर्घकालीन मार्ग शोधल्यास शहराच्या विकासाबरोबर पार्किंगचा प्रश्न देखील सहजतेने सोडवण्यासाठी पाऊल उचलावे, असेही ते म्हणाले.    

महापालिकेच्यावतीने शहरातील पार्किंगबाबतच्या प्रश्न आणि समस्यांवरील उपाययोजनांबाबत सर्वंकश चर्चा करण्यासाठी पार्किंग विषयक यंत्रणा तसेच पार्किंग विषयक नियोजन करणाऱ्या खाजगी संस्थांबरोबर बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहायक नगररचना उप संचालक प्रशांत शिंपी,  सहायक आयुक्त शितल वाकडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रशांत पाटील, प्रशासन अधिकारी मुकुंद कोळप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, विजया कारंडे, प्रसाद गोकुळे, दिपक साळुंखे यांच्यासह अर्बन वर्क्स, सेप्ट युनिवर्सिटी, अर्बन लॅब या संस्थांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे शहरात अनेक समस्या आणि आव्हाने देखील निर्माण झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात दळणवळण, रहदारीचे वाढते प्रमाण विचारात घेणे आवश्यक आहे.  पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अंदाजे 27 लाख एवढी आहे. 2041 मध्ये लोकसंख्येपेक्षा शहरात वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पार्किंगचा विचार केला तर भयावह चित्र निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत असावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच नागरी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका विविध प्रयत्न करत आहे.

महापालिकेच्या वतीने विकास आराखडा तयार करताना देखील पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवली जात आहे.   आयसीसीसीच्या माध्यमातून यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येत आहे.  स्मार्ट सिटी आणि शहराच्या रस्त्यांचा विचार करता 5 हजार सीसीटीव्ही शहरात विविध ठिकाणी बसवण्याचा मानस आहेत.  त्यासाठी दोन कंट्रोल रूम देखील निर्माण करण्यात येणार आहेत.  महापालिकेच्या यंत्रणेसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहेत.  त्यातून मिळणा-या माहितीचा वापर दळणवळण यंत्रणा योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आणि त्याद्वारे नागरी जनजीवन सुरळीत करण्याचा मानस आहे.  शहरातील पार्किंगच्या समस्यांसंदर्भात एकत्रितपणे विचार करून शहरातील सर्वयंत्रणांनी समन्वयाने काम करून मार्ग शोधल्यास निरंतर विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास देखील अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी व्यक्त केला.

तसेच  गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंगचा अधिक वापर कसा करता येईल याबाबत उपाय योजना करण्याचाही विचार असल्याचे ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.