Pimpri News : पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा; महापौरांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – संभाव्य पूर परिस्थिती विचारात घेऊन पावसाळ्या आधी गटार, नाले, स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत विभागांनी अंतर्गत समन्वय ठेऊन परिपूर्ण नियोजन करावे, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी दिले. कोविड परिस्थितीचे भान ठेवून पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजन करावे असेही त्या म्हणाल्या.     

पूर नियंत्रण उपाययोजनासंबंधी महापौर  ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झाली. आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस स्थापत्य, जलनि:सारण, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, क्षेत्रीय कार्यालय आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी पावसाळ्यापूर्वीच्या कार्यवाहीबाबत तसेच संभाव्य पूर नियंत्रण परिस्थितीबाबत आढावा आणि नियोजन करण्यासाठी महापौरांनी उपस्थित अधिका-यांना विविध सूचना दिल्या.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, संजय खाबडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, अभिजीत हराळे, सिताराम बहुरे, राजेश आगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, विजय काळे, थॉमस नरोन्हा,  आदी उपस्थित होते.        

दरवर्षी शहरातील नदीपात्रालगत वास्तव्यास असणा-या नागरिकांच्या घरात आणि झोपडट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांवर पाणी साचते, नाले तुंबतात त्याठिकाणची पाहणी करुन त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात असा आदेश महापौर ढोरे यांनी दिला. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, सध्या कोरोनाची परिस्थिती आहे हे लक्षात ठेवून पुर परिस्थितीत नागरिकांना स्थलांतरीत करताना योग्य ती दक्षता घ्यावी. उघडे डीपी बॉक्स आणि धोकेदायक ठरणा-या विद्युत वाहिन्या यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कामे करावी. पावसाळ्यातील वादळी वा-यांमुळे धोकादायक झाडे, फलक उन्मळून पडत असल्याने वेळीच धोकादायक वृक्षांची छाटणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

आयुक्त राजेश पाटील  म्हणाले, पाऊस पडत असताना पाणी तुंबणा-या भागाची पाहणी करून या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, चेंबर्स साफ करावे, पुरनियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये याची दक्षता घ्यावी.  मान्सूनपूर्व पूर नियंत्रण उपाययोजनांशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने पार पाडावी, असे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.