Pimpri news: विकास कामांच्या प्रकल्पावर राज्यातील तरुणांना रोजगार द्या: अभय भोर
एमपीसी न्यूज – तरुणांचा विकास झाला तरच राज्याचा विकास शक्य आहे. गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात लॉक डाऊनमुळे बेरोजगारीने थैमान घातले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणी आजही बेकार अवस्थेमध्ये दिवस काढत आहेत.
त्यांना नोकरीच्या कुठल्याही संधी निर्माण झालेल्या नाही. परंतु महाराष्ट्रात जे मोठे प्रकल्प चालू आहेत. या प्रकल्पावर परराज्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पावर राज्यातील तरुणालाच रोजगार द्यावा, अशी मागणी छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध सुरू असलेल्या कामाच्या प्रकल्पावर परराज्यातील तरुण काम करतात. त्याऐवजी स्वराज्यातील तरुण-तरुणींना याठिकाणी संधी देण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले. तर महाराष्ट्रातील बेरोजगारी संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. सध्या बेरोजगारी संपविण्याची गरज आहे.
सरकारने यावर विचार करून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावे. जेणेकरून अनेक प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुण-तरुणी कामाला लागतील. असे केले तरच महाराष्ट्राचा विकास शक्य आहे.
परराज्यातील कर्मचारी काम करून पैसा त्यांच्या राज्यांमध्ये पाठवतात.
महाराष्ट्रातील आर्थिक उलाढाल त्यामुळे ढासळली आहे. महाराष्ट्रातील पैसा हा महाराष्ट्रात फिरायला पाहिजे तरच महाराष्ट्राला आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकेल आणि महाराष्ट्राचा जीडीपी दर हा उच्चांक गाठून शकेल, असे भोर यांनी म्हटले आहे.