Pune : …..ज्याची घरे जळाली त्यांना तरी घर द्या-अजित पवार
एमपीसी न्यूज- केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने अनेक आश्वासने दिली. त्यातील प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देऊ, प्रत्येकाला घर देऊ असे सांगितले. त्याचे काय झाले ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. ‘ज्याची घरे जळाली त्यांना तरी घरी द्या’ या शब्दात पवार यांनी भाजपवर निशाण साधला.
पाटील इस्टेट झोपडपट्टी येथे मागील महिन्यात लागलेल्या आगीत 200 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. तेथील दुर्घटनाग्रस्तसाठी विविध सामाजिक संघटनांकडून मदत करण्यात आली आहे. आज या दुर्घटनाग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, या आगीच्या घटनेमुळे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका. तुमच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे. मात्र या जळीत घटनेला महिना उलटला तरी देखील सरकारचे याकडे लक्ष नाही अशी टीका पवार यांनी केली.