Pune : पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 3.15 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

एमपीसी न्यूज – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे 3 लाख 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवार (दि. 13)पर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी यांनी पूरस्थितीतही परिश्रम करून वीजग्राहकांना दिलासा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात विविध भागातील पूरस्थितीमुळे 44 उपकेंद्रांसह कृषी व अकृषक अशा एकूण 593 वीजवाहिन्यांवरील 17,189 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी सुमारे 5 लाख 70 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. यामध्ये 1 लाख 69 हजार कृषीपंपांसह सुमारे 4 लाख शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा समावेश होता.

  • पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सध्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जवळपास सर्वच भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये 76280 कृषिपंपांसह पुणे जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार, कोल्हापूर -1 लाख 25 हजार, सांगली – 48,250, सातारा – 22,920 तर सोलापूर – 13660 अशा एकूण सुमारे 3 लाख 15 हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा अकृषक वीजग्राहकांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 132 ग्राहक वगळता सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील शहरी भागात 100 टक्के वीजपुरवठा सुरु झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये पुणे – 112, सातारा -3140 व सोलापूर जिल्ह्यातील 49 अशा एकूण 3301 ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती ओसरत असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 1 लाख 58 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरु आहेत.

  • पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे व बारामती परिमंडलातून 25 हजार नवीन वीजमीटर, 40 हजार किलोलिटर आॅईल, 100 केव्हीए क्षमतेचे 80 रोहित्र तसेच 410 वीजखांब, उच्च व लघुदाब वीजवाहिन्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या पुरग्रस्त भागात पाठविण्यात आले आहेत. याशिवाय औरंगाबाद, लातूर, उद्गीर, नांदेड, निलंगा, ठाणे, वसई, वाशी, कल्याण आदी ठिकाणांहून वीजयंत्रणेचे विविध साहित्य कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखऱ बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा घेत आहेत. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे हे गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर व सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.

  • कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले हे आवश्यक साधनसामग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणेसोबत समन्वयासाठी कार्यरत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत.

पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे 5 हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.