Pune : ‘कोरोना’ विषाणू प्रादुर्भाव लढ्यात सिम्बॉयोसिस पाठोपाठ ‘भारती विद्यापीठ’ही सहभागी
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना, पुणेकर आपआपल्या परीने लढ्यात सहभागी झालेले आहेत.
कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर औषध उपचारासाठी सामाजिक व राष्ट्रीय भावनेतून लवळे येथील सिंबायोसिस विद्यापीठ अंतर्गत रुग्णालयाने मागील आठवड्यात “सामंजस्य कराराच्या” माध्यमातून या लढ्यात सहभागी झाले. याच धर्तीवर भारती विद्यापीठानेही आपली तयारी दर्शविली.
महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल या विषयावर सविस्तर चर्चा करून उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यामुळे भारती विद्यापीठ व पुणे महानगरपालिका यांच्यात आज ‘सामंजस्य करार’ करण्यात आला.
भारती विद्यापीठ येथे आज चर्चा करून ” सांमजस्य”,करारावर सह्या करण्यात आल्या. पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी, भारतीय विद्यापीठाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता जगताप व मेडिकल डायरेक्टर डॉ. ललवाणी यांनी सह्या केल्या.
या करारातर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारती विद्यापीठास पीपीई किट्स, N-95,सॅनिटायझर आणि रुग्णांना औषधे दिली जाणार आहेत. भारती विद्यापीठात कोरोना संशयित रुग्ण व बाधित रुग्ण व्यवस्थापन, उपचार व मनुष्यबळ यांच्यामार्फत सेवा सुविधा दिली जाणार आहे.
रुग्णाणवरील खर्च हा मनपाचे वतीने शासनाच्या सीजीएचएस (CGHS)नुसार भारती विद्यापीठास देण्यात येणार आहे.याप्रसंगी आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे उपस्थित होते.
महापौर मुरलीधर म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भाव व संशयित रुग्ण, बाधित रुग्ण यांची वाढती संख्या पाहता सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयाने पुढे केलेला मदतीचा हात अत्यन्त महत्वाचे पाऊल ठरले. मदतीचा दिवसेंदिवस ओघ वाढतच आहे. पुणे मनपा व पुणेकरांची लढाई पहाता भारती विद्यापीठानेही या लढ्यात सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय अंत्यत स्फूर्तिदायी आहे.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता पुणे मनपासह विविध संस्था, संघटना मोठया प्रमाणावर पुढे आलेल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे वाढती संख्या पहाता सिम्बॉयोसिस विद्यापीठ रुग्णालया पाठोपाठ भारती विद्यापीठाने सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे लढ्यातील उभारी देण्याचा प्रसंग असल्याचे सांगितले.