Pune : पीएमपीमधील अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना रुजू करुन घ्यावे – आम आदमी पार्टीची मागणी
Compassionate workers in PMP should be recruited - demand of Aam Aadmi Party
एमपीसीन्यूज : पीएमपीमधील अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे. त्यांना एप्रिल, मे महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पीएमपीमधे १४० विधवा आणि मृत कामगारांची मुले पाच वर्षांपासून नोकरीत आहेत. मुख्यत्वे स्वच्छता विभाग, वाहन चालक विभाग, नियंत्रक विभाग आणि दुरुस्ती विभागात त्यांच्या नेमणुका आहेत. हे सर्वजण सलग पाच वर्षे नोकरीत आहेत.
त्यांच्या नेमणूक पत्रावर ‘हंगामी रोजंदारी’ अशी नोंद आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात कामावर न येण्याबाबत त्यांना कोणतेही लेखी आदेश दिले नाहीत. त्यांच्या येण्या-जाण्याची सोयही केली नाही.
पगार देताना प्रत्यक्ष कामाचे दिवस पकडून तेवढ्याच दिवसांचे पगार दिले. आता मे महिन्यात त्यांना दरवाजावरच त्यांना अडविले जावून कामावर रुजू होऊ दिले जात नाही, असे आम आदमी पार्टीच्या पत्रकात म्हटले आहे.
कामगारांचा बेसिक पगार देणे ही कायदेशीर जबाबदारी आयुक्त, महापौर आणि संचालकांची आहे. ती जबाबदारी ओळखून त्या कामगारांना तातडीने रुजू करुन घेऊन पगार द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रावर पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत आणि डॉ. अभिजीत मोरे, संदीप सोनावणे, गणेश ढमाले, श्रीकांत आचार्य, अनुप शर्मा, राघवेंद्र राव, मनोज थोरात, सैद अली, वहाब शेख, महेश बिराजदार, चेतन बेंद्रे, सतिश यादव, आकाश मुनियान, विकास लोंढे यांच्या सह्या आहेत.