Pune Crime News : जमीन व्यवहारात 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या 5 जणांना अटक

एमपीसीन्यूज  : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना अटक केली. जमिनीच्या व्यवहारातून आरोपींनी जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागितली होती. त्यांनी जमीन खरेदी केल्यानंतर ठरल्यानुसार पैसे न देता पुन्हा पैसे मागितल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. 

याबाबत राजाराम बबन गोगावले (वय 44, रा. ससेवडी, भोर) यांनी तक्रार दिली असून गौतम जयंतीलाल सोळंकी, रणधीर जयंतीलाल सोळंकी (रा. शुक्रवार पेठ), दिलीप साहेबराव यादव, सुमित प्रकाश साप्ते व सागर दत्तात्रय मुजुमले यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात 2016 साली जमिनीचा व्यवहार झाला होता. ससेवाडी (ता. भोर) येथील जमिनीपोटी आरोपींनी फिर्यादीला 93 लाख रुपये देणे अपेक्षित होते. यासाठी बुधवार पेठेतील सोळंकी ज्वेलर्स आणि वेळू फाटा येथे आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बैठका झाल्या होत्या. दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचे खरेदीखतही झाले होते.

आरोपींनी या व्यवहारापोटी फिर्यादीला 32 लाख 50 हजार रुपये चेकद्वारे दिले. मात्र, उर्वरित पैसे मागितले असता आरोपीने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. तर उर्वरित पैसे मागू नये यासाठी फिर्यादीला बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शिवाय उर्वरित पैसे पाहिजे असतील तर 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.