Pune Crime News : लग्नाआधीच प्रियकराने विवाह नोंदणी कार्यालयातून ठोकली धूम, प्रेयसीच्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : सोबत असलेल्या मित्रांच्या ओळखीतून एकत्र आल्यानंतर त्यांची ओळख झाली… नंतर एकमेकांच्या प्रेमात ही पडले… त्यानंतरच लग्न करण्यासाठी प्रियकराने प्रेयसीला विवाहनोंदणी कार्यालयात बोलावले… परंतु, लग्न होण्याआधीच प्रियकराने विवाह नोंदणी कार्यालयातून पळ काढला.

या प्रकरणी संबंधित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस सुरेश शेलार (वय 33, रा. रासाई बंगला, एरंडवणे) असे पळून गेलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यासह अमित यशवंतराव पापळ (वय 35), अभिषेक यशवंतराव पापळ (वय 33) यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळची पणजी येथील असणारी ही तरुणी नोकरीनिमित्त काही वर्षांपूर्वी पुणे शहरात आली होती. एका खाजगी कंपनीत नोकरी करत असताना कॉमन मित्रांच्या माध्यमातून तिची तेजस शेलार याचा सोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तेजस शेलार याने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, पीडित तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्याने आरोपीने 13 फेब्रुवारी रोजी तिला मामलेदार कचेरी येथे साध्या पद्धतीने विवाह करू असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी ते मामलेदार कचेरी येथे एकत्र आले. परंतु फिर्यादी तरुणी बाथरूमला गेल्याचे पाहून आरोपी तिला सोडून त्या ठिकाणाहून पळून गेला. त्यानंतर संबंधित तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले आरोपीविरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.