Pune Crime News : ‘त्या’ खून प्रकरणात रेकॉर्डवरील तिघांना अटक, चार अल्पवयीन मुलेही ताब्यात

एमपीसीन्यूज  : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी संग्राम गुलाब लेकावळे (वय 19) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे. यातील तिघे सराईत गुन्हेगार आहेत तर चार जण अल्पवयीन आहेत.

सचिन तानाजी वाघमारे (वय 22, रा. कात्रज), सोमनाथ दत्तात्रय गाडे (वय 25) आणि हेमंत उर्फ तुषार जालिंदर सरोदे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संग्राम लेकावळे याने ताब्यात घेतलेल्या एका 16 वर्षीय मुलाला 6 महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. लेकावळे हा येता-जाता त्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात टपली मारत असे. त्याशिवाय तुला आणखी एकदा खूप मारणार, अशा धमक्या देखील तो अल्पवयीन मुलाला देत असे.

सतत होणाऱ्या या मारहाणीमुळे या मुलाने अटक करण्यात तिघांना हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी सर्व आरोपींनी लेकावळे याला आंबेगाव पठार परिसरात गाठले आणि पुन्हा वाद घातला. तर चार अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करत निर्घुण खून केला.

दरम्यान, या खून प्रकरणातील आरोपी पुणे रेल्वे स्टेशनवर असून रेल्वेने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर येथील चौघेजण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.