Pune : सावरकरांपेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा – हुसेन दलवाई
एमपीसी न्यूज – देश अत्यंत अस्थिर अशा वातावरणातून जात असताना सावरकरांसंदर्भातील सध्या सुरू असलेल्या मुद्द्यापेक्षा जनतेला देशात विकासकामे होणे अपेक्षित असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हुसेन दलवाई म्हणाले की मंदीमुळे देशातील अनेक कंपन्यांनी आपले काम बंद केले आहे. अनेक तरुणांचे रोजगार बुडाले आहेत. या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न पूर्ण होणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल
सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव बुडून बसले असतील तर त्यांची निराशा होईल. पण हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबंध ताणलेले नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. आमच्या सरकारचे नावच महाराष्ट्र विकास आघाडी आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच आमचे सरकार झाले आहे, असेही काँग्रेस नेते हुसेन दलवाई यावेळी म्हणाले.