Pune : गीत महाभारतातील दुर्योधन, भीम व्यक्तिरेखा भावल्या – दिलीप प्रभावळकर
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे ‘गीत महाभारत' श्राव्य आवृत्तीचे प्रकाशन आणि यू ट्युबवर लोकार्पण
एमपीसी न्यूज-डॉ. वा. शं. देशपाडे लिखित ‘गीत महाभारत‘ या काव्यातून दृश्यात्मक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. काव्यवाचन करताना त्यात इतका गुंतून गेलो की कलाकाराला आवश्यक असणारी अलिप्तता विसरून गेलो. महाभारतातील काही शब्द नव्याने कळले, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या. ‘गीत महाभारत‘ यातील दुर्योधन आणि भीम या व्यक्तिरेखा (Pune) आवडल्याचेही ते म्हणाले.
डॉ. वा. शं. देशपाडे लिखित ‘गीत महाभारत‘ या पुस्तकाच्या श्राव्य आवृत्तीचे प्रकाशन आणि यू ट्युबवरील लोकार्पण काल (दि. 23) प्रभावळकर यांच्या उपस्थितीत भरत नाट्य संशोधन मंदिरात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. लेखक, कवी डॉ. वा. शं. देशपाडे, अभिवाचक स्नेहल दामले, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात (Pune) आले होते.
पांडू राजाच्या निधनापासून ते कुरुक्षेत्रावरील पांडवसैन्याच्या विजयापर्यंतच्या कथानकाचे उद्बोधक आणि रंजक दर्शन ‘गीत महाभारत‘ रसिकांना काव्यरूपात घडले आहे. श्राव्य आवृत्तीतील कवितांचे अभिवाचन दिलीप प्रभावळकर यांनी केले आहे, तर निवेदन स्नेहल दामले यांचे आहे. श्राव्य आवृत्तीची झलक या प्रसंगी दाखविण्यात आली.
‘गीत महाभारत‘ या पुस्तकाच्या श्राव्य आवृत्तीच्या निर्मितीदरम्यानचा प्रवास प्रभावळकर आणि दामले यांच्याशी झालेल्या संवादातून उलगडत गेला. डॉ. मंदार परांजपे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
श्राव्य आवृत्तीची संकल्पना आवडल्याचे सांगून प्रभावळकर म्हणाले, महाभारत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे याविषयी देशपांडे यांची तळमळ भावली. जुन्या काळातील भाषा असल्याने भाषेचे वैभव कळले. लेखक असूनही महाभारतातील काही शब्द नव्याने कळले. श्राव्य आवृत्ती तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
द्रौपदी ही व्यक्तिरेखा आवडल्याचे स्नेहल दामले म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ही कलाकृती तरुणांना समजेल की नाही हा प्रश्न राहिलेला नाही. या कलाकृतीपर्यंत तरुणांनी येणे आवश्यक आहे.
महाभारत सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतून ‘गीत महाभारत‘ची निर्मिती केल्याचे वा. शं. देशपांडे म्हणाले. महाभारताची लोकप्रियता आजही टिकून असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
मान्यवरांचे स्वागत भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि विश्वस्त रवींद्र खरे यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले. श्राव्य आवृत्तीच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या कलाकारांचा प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाची सांगता अनिहा डिसोझा यांनी गायलेल्या गीताध्यानम् आणि पसायदानाने (Pune) झाली.