Pune : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या अरण्येश्वर परिसरातील नागरिकांचा रास्ता रोको
एमपीसी न्यूज- बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला प्रचंड प्रमाणात पूर आला. अरणेश्वर कॉर्नर, टांगेवाला कॉलनी भागातील नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उघड्यावर आले. मात्र या नागरिकांसाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नाही असा आरोप करीत येथील नागरिकांनी आज, शुक्रवारी तावरे कॉलनी चौकात रास्ता रोको करीत आपला संताप व्यक्त केला.
पुराचा फटका बसून ४० तास उलटून गेले तरीही पालिका प्रशासनाची मदत यंत्रणा अद्याप पोहोचली नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली. नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील सामानाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. घरामध्ये चिखलाचे साम्राज्य असून स्थानिक नागरिक या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याची तक्रार या नागरिकांनी केली.
अखेर आपला संताप व्यक्त करीत नागरिकांनी तावरे कॉलनी चौकात रास्ता रोको केला. यामध्ये महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.