Pune : डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उलगडला राष्ट्रपुरुषांचा जीवनप्रवास

‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे यांच्या तर्फे ‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ हा चार दिवसीय व्याख्यानमालेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजीमहाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही प्रमुख प्रसंगाचे सखोल विवेचन करतांना उपस्थितांना या व्यक्तींच्या अनुकरणीय गुणविशेषांची ओळख करून दिली.

लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जीवनात, संशोधक, राजकीय पुढारी, विचारवंत अशा वेगवेगळ्या भूमिकांमधील समन्वय कसा साधला, ज्ञानहेतू व कर्महेतू या जीवनध्येयांमधील प्राधान्यक्रम कसा ठरवला व ती साध्य करण्यासाठी वेळेचे व माणसांचे व्यवस्थापन आणि तणाव व भावनांचे नियोजन कसे केले हे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले.

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचा व तत्कालीन राजकीय परिस्थितीला कलाटणी देणारा प्रसंग. शिवाजीमहाराजांचे धैर्य, परिस्थितीचा सर्वंकष केलेला अभ्यास, वेळेचा व पर्यायांचा सुयोग्य वापर, उद्दिष्टांप्रत असलेली निष्ठा, समविचारी माणसांची निर्माण केलेली व्यवस्था व संवादमार्ग यांमुळे ते या आपत्तीचा यशस्वी सामना करू शकले. या प्रसंगाला उदाहरण म्हणून घेत डॉ. नाडकर्णी यांनी शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सर्वांसमोर मांडले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र सैन्याची निर्मिती करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे सैन्यदल केवळ २ वर्षात अर्धे जग पालथे घालून राजनैतिक वाटाघाटींच्या आधारे, वेगवेगळ्या देशांचा पाठींबा मिळवून तयार केले. या कालखंडामधे नेताजींचे नेतृत्वगुण, जागतिक स्तरावरील राजकारण हाताळण्याचे कौशल्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा व त्यासाठी वैयक्तिक सुखाचा केलेला त्याग या व्यक्तिमत्व विशेषांचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या देदीप्यमान कालखंडाची एकहाती उभारणी करणाऱ्या नेताजींच्या गुणवैशिष्ठ्यांचा डॉ नाडकर्णी यांनी वेध घेतला.

महात्मा गांधींनी दांडी येथे केलेला मिठाचा सत्याग्रह व सविनय कायदेभंगाची चळवळ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड आहे. सर्व जगात नोंद घेतल्या गेलेल्या या सत्याग्रहामागील गांधीजींची व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय विचारमंथन, सत्याग्रहाचे नियोजन, अंमलबजावणी, मिळालेला प्रतिसाद व स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीवर त्याचे झालेले दूरगामी परिणाम याबद्दल डॉ. नाडकर्णी यांनी विवेचन केले.

या चारही राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथांमधून त्यांच्या मानसिक ताकदीचा व प्रतिकूल परिस्थितीत अंगिकारलेल्या व विकसित केलेल्या त्यांच्या विविध गुणांचा परिचय होतो. विशेष करून त्यांची माणसे जोडत जाण्याची कला, काहीजणांशी काही विषयांवर मतभेद असले तरी ते मान्य करून, इतर पातळ्यांवर त्यांनी त्या लोकांशी जपलेले संबंध, सर्व पर्याय चाचपून बघण्याची वृत्ती, निराश न होता अथक प्रयत्न करत राहणे व स्वतः आपल्या वागणुकीतून पुढच्यांना घालून दिलेले पायंडे हे त्यांच्या कार्याला यशस्वी करतात असे दिसते.

विभूतीपूजा / व्यक्तिपूजा करण्यापेक्षा त्यांच्या या गुणांचा सर्वंकष आढावा घेतला व त्यातून कालसुसंगत असे काही शिकलो तर सर्वांनाच इतिहासाकडे पाहण्याची आगळीवेगळी वर्तमानदृष्टी मिळेल या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांची वस्तुनिष्ठ अभ्यासपद्धती व पुराव्यांसहीत प्रभावी सादरीकरण यातून हे उद्देश साध्य झाले. राष्ट्रभक्तीने प्रेरित व मंत्रमुग्ध झालेल्या उपस्थित जनांच्या राष्ट्रगीताने या व्याख्यानमालेचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.