Pune Good News: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली; धरणांत 60 टक्के पाणीसाठा

वर्षाला सुमारे 18 टीएमसी पाणी पुणेकरांना लागते. त्यापैकी 17.47 टीएमसी पाणी धरणांमध्ये जमा झाले आहे.

एमपीसी न्यूज – पुणेकरांच्या डोक्यावर घोंगावत असलेले पाणीकपातीचे संकट आता दूर झाले आहे. गेल्या 3 – 4 दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात तब्बल 17.47 टीएमसी म्हणजेच 59.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षभराची मिटली आहे.

महापालिकेततर्फे महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी धरणांतून उचलले जाते. वर्षाला सुमारे 18 टीएमसी पाणी पुणेकरांना लागते. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवट पर्यंत दमदार पावसाला आणखी सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

खडकवासला 1.86 टीएमसी, (94.08 टक्के), पानशेत 7.03 टीएमसी (66.01 टक्के), वरसगाव 7.08 टीएमसी (55.24 टक्के), टेमघर 1.50 टीएमसी (40.55 टक्के) असा चारही धरणांतील एकूण पाणीसाठा 17.47 टीएमसी म्हणजेच 59.92 टक्के आहे. ही आकडेवारी रविवारी सकाळी 6 पर्यंतची आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के धरणे भरली होती. खडकवासला धरणाच्या पाणलोट पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी कॅनॉलद्वारे विसर्ग सुरू आहे. विसर्गाचा वेग 1 हजार 103 क्युसेक इतका आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.